पाथर्डी (प्रतिनिधी):- पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून संकटकाळी पत्रकार हे समाजासाठी दिशादर्शक असतात, निष्पक्ष आणि समाज हितासाठी जनजागृती केलेल्या अविरत कार्याचा सन्मान म्हणजे पत्रकारांच्या कार्याची पावती असून समाजातील दिशादर्शक व्यक्तिमत्वाच्या सन्मानासाठी पत्रकारांनीच राबवलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण पोपटराव पवार यांनी केले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ व सत्यजित महाराष्ट्र मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील आदर्श व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते. द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हरिहर गर्जे व रोहित वाळके यांना देण्यात आला.
पवार पुढे म्हणाले की ,जात-पातीचे लेबल घेऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यात खरा आनंद आहे, माणसाने माणूस म्हणून जगायला शिकलं की आयुष्याचा आनंद द्विगुणित होतो. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र ,राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्याना देखील पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पवार हे होते.कार्यक्रमावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करावा लागतो संघर्ष करून आपले नाव लौकिक मिळवुन जे यश मिळते ते यश सर्वमान्य व सुखद असते. छोट्या गोष्टींमधून प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे त्याचबरोबर पोलीस हा समाजाचा मित्र असून नागरिकांनी त्यांच्या व्यथा पोलिसांपर्यंत पोहोचल्या तर पोलिसांना काम करणे अधिक सुलभ होईल असा विश्वास आम्ही जनतेच्या मनात तयार करत आहोत त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समीर मणियार तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचे मीडिया जिल्हाध्यक्ष आफताब शेख, प्रा संभाजी पवार, बाबासाहेब बोडके आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम कांबळे यांनी तर आभार अन्सार शेख यांनी मानले.