आष्टी : (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने साडेतीनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. यापैकी अनेक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे एक किंवा दोन हप्ता, तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही हप्ता जमा झालेला नाही. शेतकऱ्यांना राहिलेले कांदा अनुदान एकरकमी मिळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नगदी पिक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाकडे वळाला आहे.पण मध्यंतरी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी जेरीस आला होता. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-याला हातभार लावावा यासाठी राज्य सरकारने मार्च २०२३ मध्ये ३५० रूपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले.अनुदान जाहीर केल्यानंतर अनेक नियम व अटी लावल्या त्या अटींची पूर्तता करता करता शेतकरी जेरीस आला होता.त्या दिव्य अटी पार केल्यानंतर पुन्हा पणन विभागाने चाळणी लावली.यात दोन तीन महिने गेले.त्यानंतर सहा महिन्यांनी आगस्ट व सप्टेंबर महिन्यात दहा -दहा हजार रुपयांचे दोन हप्ते अनुदान म्हणून देण्यात आले.पण उर्वरित अनुदान अजूनही मिळाले नाही.नऊ महिने होऊनही कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची फरफट सरकारने थांबून लवकर अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे.