आष्टी(प्रतिनिधी)- शासनाने दूधदर निश्चित करूनही अवघ्या दोन-तीन महिन्यांत दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले. त्यामुळे ऐन दिवाळीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.पावसाअभावी चारा संकट ओढावले आणि सोबत दुधाचा दरही घटल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दुध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे.
कोविड प्रकोपानंतर मागील वर्षी प्रथमच दूध व्यवसायत उभारी आली आणि दुधाचे दर ३८ ते ४० रुपये झाले. परिणामी कोविडमध्ये उद्ध्वस्त झालेला शेतकरी व तरुण या व्यवसायात जास्त प्रमाणात उतरला.लाखो रुपये किंमतीच्या संकरीत दुधाळ गायी व म्हशी खरेदी करून, आपल्या संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न करू लागला; पण हा आनंद चिरकाल न राहता त्यावर विरजण पडले.अवघ्या काही महिन्यात दूधदर ढासळत राहिले ते आजपर्यंत त्यावर शासनाने नेमलेल्या विविध समित्या फक्त कागदावरच राहिल्याने दूध उत्पादक मात्र दराअभावी देशोधडीला लागले आहेत.
त्यात चालू वर्षी पावसाने जोरदार दडी मारल्याने पशुधनाचा चारा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्याच्या भीषण झळा आत्ताच चटका देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असून, दूध उत्पादन घटत चालले असताना दर कमी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यात जनावरांच्या पोषण आहार (खुराक) यांच्या किंमतीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. सरकी, कांडी याची भाववाढ अटळ होत असताना शासन मात्र सुस्त असल्याचे दूध व्यवसायिक विष्णू तळेकर यांनी सांगितले.