पाथर्डी (प्रतिनिधी) :- तारकेश्वर गडाचे संस्थापक वै. नारायण महाराज यांचा समाज प्रबोधनाचा व हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असलेले तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री चांगल्या पद्धतीने चालवत असून तारकेश्वर गडाचा विकास व्हावा, यासाठी आपण ठामपणे गडाच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महिंदा येथील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर आयोजित केलेल्या वै. नारायणबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. यावेळी गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, व्याख्याते गणेश शिंदे, अक्षय भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, तालुका प्रमुख विष्णुपंत ढाकणे उपस्थित होते. सकाळी आमदार मोनिका राजळे, आमदार सुरेश धस आदींसह विविध मान्यवरांनी श्री नारायण बाबांचे आशिर्वाद घेतले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सध्या भारत पाक युद्ध चालु आहे. पाकड्यांचे कंबर
मोडण्याचे व अतिरेक्यांचे अड्डे उद्धस्त करण्याचे मोदी, गृहमंत्री अमित शाह व राजनाथसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सैनिक करत असून कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे नामोनिशान आता मिटल्या शिवाय राहणार नाही. तारकेश्वर गड हा सर्वांना तारणारा गड असून जवळच
मोहटा देवीचे मंदिर असल्याने हा संपूर्ण डोंगर परिसर म्हणजे भक्ती शक्तीचा संगम आहे. गडाची महती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम सर्वांनी करायला हवे.
नारायणबाबांनी गो मातेची मोठी सेवा करण्याचे काम केले तर गोरक्षकांना संरक्षण देण्याचे काम मी मुख्यमंत्री असताना केले आहे. ज्यांच्या आठवणींनी पुण्यप्राप्ती होते त्यांचीच पुण्यतिथी साजरी केली जाते. नुसते नारायण नारायण म्हंटले तरीही पुण्यप्राप्त होते. राजकीय अधिष्ठनापेक्षा धार्मिक अधिष्ठान महत्वाचे असते.
या ठिकाणी येऊन मला आध्यत्मिक समाधान व उर्जा मिळाली असून हा गड म्हणजे ब्रम्ह व शिवाचे रूप असल्याचेही ते म्हणाले.
आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी गड ठामपणे उभा राहील. बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा अवतार म्हणजे शिंदे आहेत. मोदी जसे देशात काम करतात तसेच काम शिंदे राज्यात करत असून दोघांमध्ये केवळ पक्षभेद आहे. लाडकी बहीण योजनेमुळे ते घराघरात पोहचले असल्याचेही शास्त्री म्हणाले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.