अहिल्या नगर(प्रतिनिधी)- शहरातील सुविख्यात गायक निवेदक राजेंद्र टाक यांना २०२५-२६ करिताचा जीवन गौरव पुरस्कार नुकताच छञपती संभाजी नगर येथील समग्र सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजी नगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात विधान परिषद सदस्य आमदार शिरीषजी केणेकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणतज्ञ एस. पी. जवळकर, महंत संघर्ष गिरिजी, महामंडलेश्वर सुखदेवजी महाराज, महंत आकजाही महाराज, महंत भरातगिरिजी महाराज, महामंडलेश्वर डॉ . शिवलक्ष्मी आईसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या बहारदार गायन आणि निवेदन शैलीने त्यांनी महाराष्ट्रभर आपला चाहता वर्ग तयार केला आहे. कलाक्षेत्रातील नवोदितांकरिता प्रोत्साहनपर गायन स्पर्धांचे आयोजन. निवेदन प्रांतातील अभ्यासकांकरिता मार्गदर्शन असे विविध उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. बोलण्याशी सबंधित सगळ्याच स्तरावर त्यांनी प्रॅक्टिकली काम केलंय. रेडिओ, टिव्ही, मंच, व्यासपीठ, अशा सर्वच ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. गायक, निवेदक, गीतकार, संगीतकार, कथाकार अशा चतुरस्र भुमिका निभावणारे श्री. टाक हे अहिल्यानगरमधील एकमेव कलाकार आहेत.
त्यांनी ३५ वर्षात ५००० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. ग्रामपंचायत सदस्य ते थेट मा. पंतप्रधान, महामहीम राष्ट्रपती अशा देशातील उच्चपदस्थांच्या उपस्थितीत त्यांनी गायन, निवेदन केले आहे. अनेक कलाकारांच्या मुलाखती, त्यांनी घेतल्या आहेत. छञपती शिवरायांची कथा व्यासपीठावरून सांगणारे श्री टाक हे महाराष्ट्रातील पहिले कथा प्रवक्ते ठरले आहेत. भारतातील पहिला म्युझिकल मोटीवेशनल शो त्यांनीच सादर केला. सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखानन्याजोगे आहे. शालेय महाविद्यालयीन जीवनातून सुरू झालेल्या त्यांच्या या कलाक्षेत्रातील मुशाफिरीबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
यापूर्वीही त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.