आष्टी (प्रतिनिधी):- तालुक्यात उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत आहे.४० पार तापमान जात असल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.उन्हाच्या झळांसोबतच तालुक्यातील जलसाठा कमी झाला आहे. नदी-नाले तर कोरडेठाक झाले आहेत.पाणीपातळीने तळ गाठला आहे.ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना आता पाणीटंचाई च्या झळा बसू लागल्या आहेत.अद्यापर्यंत तालुक्यात एकही टॅंकर चालु मंजूर नसून टॅंकर सुरू करण्यासाठी १० गावांनी तहसिलदार कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले असून हि गावे टॅंकरच्या प्रतिक्षेत आहेत.
आष्टी तालुक्यातील १० गावात यंदाही पाणीटंचाई आहे. गावातील तलाव पूर्ण कोरडे पडल्याने गावाशेजारील विहिरीहून महिलांना पाणी आणावे लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाल्यास विहीरीत पाणी सोडले जाते आणि मग ते पाणी गावांना पाणीपुरवठा होतो. सद्यस्थितीत अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. तर तलाव कोरडेठाक पडले आहेत.ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.जसजसा उन्हाळा वाढतोय तसतशी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून टँकर मागणी देखील वाढण्याची शक्यता आहे.तालुक्यात बीड सांगवी, कणसेवाडी,गुंडवाडी गंणगेवाडी,भोजेवाडी, पांगरा,कारखेल,पाटसरा,अंभोरा, खरडगव्हाण, सोलापूरवाडी,काकडेवाडी यांचे प्रस्ताव पाठवायचे असून चिंचेवाडी व जळगाव या दोन गावांचे प्रस्तावाचे स्थळ पाहणी होणे बाकी आहे.या गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.या गावांनी टंँकर मागणीचे प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे सादर केले आहेत.सदरील प्रस्ताव मंजुरी मिळाल्यावर सदर गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
➡️ आष्टी तालुक्यातील जवळपास १० गावांचे टॅंकर साठी प्रस्ताव तहसिल कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.यातील २ गावांची स्थळी पाहणी शुक्रवारी करण्यात येणार असून हे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाल्यानंतर टॅंकर सुरू करण्यात येणार आहेत.
– जयदत्त चव्हाण ( सहाय्यक महसूल अधिकारी,आष्टी)