आष्टी (प्रतिनिधी) गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मध्यम प्रकल्पातील साचलेला गाळ उपसा करण्यास परवानगी मिळाली असून महाराष्ट्र शासनाच्या मृत व जलसंधारण विभागाने याबाबतचा आदेश जा.क्र. 857/2025 दि. 11 एप्रिल 2025 काढला असून दिनांक 13 किंवा 14 एप्रिल रोजी मध्यम प्रकल्पातील गाळ काढणे या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत प्रकल्पातील गाळ आपल्या शेतात टाकून घ्यावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आष्टी तालुक्यातील अनेक मध्यम प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. हा गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असून तलावांच्या पाण्यासाठी वाढ होणार असल्यामुळे अशा दुहेरी उद्देशातून गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंधित विभागाचे मंत्री, प्रधान सचिव यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा करत असल्यामुळे अखेर या योजनेअंतर्गत गाळ काढण्यास परवानगी मिळाली असून या कामासाठी 2 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून नाम फाउंडेशन आणि टाटा उद्योग समूह या संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामे राजाभाऊ शेळके आणि केशव आघाव यांचीही मोठे सहकार्य लाभले आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले की, तलावातील गाळ उपसा करून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्स मध्ये भरून देण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल रोजी जलसंधारण विभागाने आदेश काढून मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामासाठी अशासकीय संस्था म्हणून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन पुणे आणि टाटा उद्योग समूह या संस्थांची नियुक्ती या गाळ काढणे कामासाठी करण्यात आलेली आहे.आष्टी तालुक्यातील मेहेकरी मध्यम प्रकल्पातील 1 लाख 11 हजार तीनशे घनमीटर गाळ उपसा करण्यास परवानगी मिळाली असून कडा मध्यम प्रकल्पातील 72 हजार 800 घनमीटर कडी मध्यम प्रकल्पातील 50 हजार 250 घनमीटर आणि रोटी मध्यम प्रकल्पातील 1 लाख 8 हजार तीनशे घनमीटर एवढा गाळ उपसण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीवर हा गाळ टाकल्यास तलावातील गाळामुळे जमीन सुपीक होणार असून रासायनिक खताचा खर्च देखील कमी होत असतो त्यामुळे जमिनीचा पोत देखील वाढतो आणि तलावातील गाळ उपसल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होणार असून परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीमध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे या गाळ मुक्त धरण आणि गायुक्त शेत या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा 13 एप्रिल किंवा 14 एप्रिल रोजी रोटी मध्यम प्रकल्प येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देखील आ.सुरेश धस यांनी शेवटी केले आहे.