आष्टी ( प्रतिनिधी)आष्टी – शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशानंतर आष्टी तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त झाला. तालुक्यातील १२७ ठिकाणी रिक्त असलेली मदतनीसांची पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली असल्याची माहिती, बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत हद्दीतील ७९ महसुली गावांत १२७ अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीसांच्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाने शुक्रवारी (ता. २६) प्रसिद्ध केले आहे. सोमवारी (ता. २९) पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार (ता. ७ ऑगस्ट) हा आहे, असेही श्रीमती वाघमारे यांनी सांगितले.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा, पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर, B.Ed, D.Ed आणि सोबत MS-CIT केलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. १८ ते ३५ वयोगटातील महिला उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ता. सात ऑगस्टच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, आष्टी येथे द्यावयाचे आहेत.